साफसफाईची भरमसाठ बिलं काढा पण साफसफाई ठेवण्याचं थोडं तरी सौजन्य दाखवा, राजूर ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेचे वाभाडे
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या राजूर ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे गावकरी कमालीचे वैतागले आहेत. गावात जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले असून रहिवाशी वस्ती व सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. घाण कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. गावातील अस्वच्छतेमुळे नागरिक विविध विषाणूजन्य आजारांना बळी पडू लागले आहेत. गावात स्वच्छता ठेवण्याकडे ग्रामपंचायत पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याची लेखी तक्रार युवासेना (उबाठा) राजूर शाखा प्रमुख अमृत फुलझेले यांनी वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
राजूर ग्रामपंचायतीत पूर्णतः भोंगळ कारभार सुरु आहे. साफसफाईच्या नावावर नुसती बिलं काढून खिसे गरम केली जात असल्याचा आरोप तक्रारकर्त्याने तक्रारीतून केला आहे. साफसफाईची नुसती बिलं काढली जातात. पण गावात साफसफाई ठेवण्याकडे मात्र लक्ष दिले जात नाही. कचरा कुंड्या कचऱ्याने तुडुंब भरल्या असून कचरा कुंड्यांमधून कचरा बाहेर पडून त्याचे ढिगारे तयार झाले असतांनाही कचरा उचलण्याचे सौजन्य ग्रामपंचायत दाखवायला तयार नाही. रहिवाशी वस्ती, सार्वजनिक परिसर तथा मंदिर व विहाराजवळही कचरा व घाणीचे साम्राज पसरले आहे. कचऱ्याचे ढिगारे व गावात निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायत सरपंच व सचिवांना उघड्या डोळ्याने दिसत असतांनाही ते याकडे डोळेझाक करतांना दिसत आहे.
त्याचप्रमाणे गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याही अनेक दिवसांपासून साफ करण्यात न आल्याने त्या पूर्णपणे तुंबल्या आहेत. नाल्यांमध्ये घाणी पाणी साचून राहत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांचे श्वास घेणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायतीची साफसफाईच्या नावावर नुसती बोंबाबोंब असल्याने गावकऱ्यांमध्ये ग्रामपंचायती विषयी प्रचंड असंतोष खदखदत आहे. गावातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरिक संसर्गजन्य व विषाणूजन्य आजारांना बळी पडू लागले आहेत. त्यातल्या त्यात ग्रामपंचायत कर्मचारी परिसरातच प्लास्टिक जाळत असल्याने त्यातून निघणाऱ्या रासायनिक धुरामुळेही नागरिकांचा श्वास गुदमरू लागला आहे.
सार्वजनिक ठिकाणी व रहिवाशी वस्त्यांमध्ये कचऱ्याचे ढिगारे तयार झाल्याने गावात रोगराई पसरू लागली आहे. परिसरात जमा होऊन असलेला कचरा हवेमुळे नागरिकांच्या घरात उडत असल्याने नागरिकांमधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे. ग्रामपंचायत गावात साफसफाई व स्वच्छता ठेवण्याकडे जीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची लेखी तक्रार युवासेना राजूर शाखा प्रमुख अमृत फुलझेले यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
No comments: