प्रशांत चंदनखेडे वणी
ईद-ए-मिलाद व गणेश विसर्जन योगायोगानं एकाच दिवशी आल्याने ईद निमित्त २८ सप्टेंबरला निर्धारित असलेली शासकीय सुट्टी राज्य शासनाने एक दिवस पुढे ढकलली. शासनाने काल २७ सप्टेंबरला सायंकाळी परिपत्रक काढून २९ सप्टेंबरला सुट्टी जाहीर केल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला असून नागरिकांच्या नियोजित कामकाजांचे वेळापत्रक कोलमडले आहे. सुट्टीची तारीख अचानक बदलण्यात आल्याने नागरिकांची महत्वपूर्ण कामे खोळंबली जाणार आहे. नगरीकांनी कामकाजाचे आखलेले नियोजन अनपेक्षितपणे सुट्टी पुढे ढकलण्यात आल्याने पूर्णतः बिघडणार आहे. ईदची सुट्टी एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याने नागरिकांची कार्यालयीन कामे रखडली जाणार असल्याने त्यांच्यात नाराजी दिसून येत आहे. सुट्टी रद्द झाल्याने शासकीय कर्मचाऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्येही आज कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगण्य दिसून आली. योगायोगानं हिंदू व मुस्लिम बांधवांचे धार्मिक सण, उत्सव एकाच दिवशी आल्याने शासकीय सुट्टीत अकल्पित बदल करण्यात आला. त्यामुळे नागरिकांच्या निर्धारित कामांमध्ये व्यत्यय निर्माण झाल्याने त्यांचा त्रास वाढणार आहे. या आधीही आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने असाच पेच निर्माण झाला होता. त्यावेळीही बकरी ईद दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचे आव्हान करण्यात आले होते.
धार्मिक सण, उत्सव, सोहळे व महापुरुषांच्या जयंत्या एकाच दिवशी आल्याची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वीही असे अनेकदा घडले आहे. आणि ते धार्मिक सण, उत्सव एकोप्याने साजरे देखील झाले आहे. राम नवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती एकाच दिवशी आल्याचाही योगायोग घडला आहे. तात्पर्य म्हणजे हे दोन्ही सण, उत्सव एकाच दिवशी जल्लोषात साजरे देखील करण्यात आले. यावर्षी अधिकचा महिना असल्याने ईद आणि गणेश विसर्जन एकाच दिवसावर आल्याने शासनाने निर्धारित सुट्टीच रद्द केली. मुस्लिम बांधवांना यावेळीही सामंजस्याची भावना ठेवण्याचे जाहीरपणे सांगण्यात आले. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांचा मोठा सण मानला जातो. मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून हा सण मुस्लिम बांधव आनंदात साजरा करतात. असे असले तरी सुट्टी रद्द केल्याने नागरिकांची महत्वाची कामे मात्र रखडली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. २९ सप्टेंबर शुक्रवार पासून तर सोमवार २ ऑक्टोबर पर्यंत सलग सुट्ट्या असल्याने नागरिकांची कार्यालयीन कामे खोळंबली जाणार आहे. ईद निमित्त शासकीय सुट्टी रहात असल्याने नागरिक शासकीय कार्यालयांकडे फिरकलेच नाही. त्यामुळे त्यांना शासकीय कार्यालयांमधून मिळणारी महत्वाची कागदपत्रे व दाखले घेता आले नाही. आता सतत चार दिवसांचा शासकीय अवकाश राहणार असल्याने त्यांना दाखले मिळविण्याकरिता मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. चार दिवस बँकेचे व्यवहारही बंद राहणार असल्याने कास्तकारांसह छोटे मोठे व्यावसायिक व दैनंदिन व्यवहार करणाऱ्या नागरिकांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागणार आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या कारणावरून आज ईदची असलेली सुट्टी पुढे ढकलण्यात आली. परंतु २८ सप्टेंबरला शासकीय सुट्टी असल्याने अनेकांनी आपल्या कामांचे वेळापत्रक ठरवून ठेवले होते. परंतु २७ सप्टेंबरला अचानक राज्य शासनाने परिपत्रक काढून सुट्टीची तारीखच बदल्याने त्यांची ठरलेली कामे खोळंबली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

No comments: