प्रशांत चंदनखेडे वणी
शासनाकडून गोरगरिबांना हक्काचं घर बांधता यावं म्हणून अनुदान देण्यात येतं. त्याकरिता शासनाकडून विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. वणी तालुक्यात शबरी, रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थी आहेत. घरकुलासाठी पात्र ठरलेल्या बहुतांश लाभार्थ्यांना केवळ अनुदानाचा पहिलाच टप्पा मिळाला आहे. उर्वरित अनुदान मात्र अद्याप मिळलेले नाही. त्यामुळे त्यांच्या घराचे बांधकाम रखडले आहे. घरकुल योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी घराचे पक्के बांधकाम करण्याकरिता आपली राहती घरे खोलली. मात्र त्यांना अनुदानाचा पहिलाच टप्पा मिळाला. अनेक महिने लोटूनही त्यांना उर्वरित अनुदान मिळाले नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात त्यांच्यावर विपरीत परिस्थिती ओढवली. प्रशासनाला वारंवार निवेदने, अर्ज व पाठपुरावा करूनही लाभार्थ्यांना उर्वरित अनुदान देण्यासंदर्भात कुठलेच पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांच्या न्यायाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे. घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे उर्वरित अनुदान न मिळाल्याने ३० सप्टेंबर पासून कार्यकर्ते व लाभार्थ्यांसोबत तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सांगितले आहे.

No comments: