प्रशांत चंदनखेडे वणी
शेतकऱ्यांच्या वाढत असलेल्या आत्महत्या चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका व मिळणारी तुटपुंजी मदत यामुळे शेतकरीवर्ग प्रचंड नैराश्येत आला आहे. नैराश्येतून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागला आहे. आस्मानी व सुलतानी संकटाने तो घायाळ झाला आहे. ढाकोरी (बोरी) येथे परिवारासह वास्तव्यास असलेला किशोर देठे हा युवा शेतकरी आपली वडिलोपार्जित शेती वाहून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायचा. आज २७ ऑक्टोबराला सकाळी तो नेहमी प्रमाणे शेतात गेला. आणि शेतातच त्याने विषारी द्रव्य प्राशन केले. त्याने विष प्राशन केल्याचे कुटुंबियांना समजताच त्यांनी तात्काळ त्याला कोरपना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तोवर बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घरातील कर्त्या पुरुषाने आत्मघाती निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आत्महत्या करण्याने कुटुंब दुःख सागरात बुडालं आहे. त्याच्या पश्च्यात आई, पत्नी व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments: