वडजापूरच्या मातीवर कबड्डी सामन्यांचे दमदार आयोजन! स्पर्धेचे थाटात उद्घाटन; ग्रामीण प्रतिभेला नवे व्यासपीठ
प्रशांत चंदनखेडे वणी :-
मातीचा सुगंध, प्रेक्षकांचा जल्लोष आणि खेळाडूंचा जोश अशा उत्साहपूर्ण वातावरणात वडजापूर येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. ‘जय पेरसापेन स्पोर्टिंग क्लब’ आणि ‘जय भवानी क्रीडा मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे राज्य नेते राजू उंबरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी कबड्डी हा महाराष्ट्राच्या परंपरेशी निगडित खेळ असल्याचे सांगत, “ग्रामीण भागातील युवकांमध्ये अपार क्रीडा क्षमता दडलेली आहे. अशा स्पर्धांमुळे त्यांना योग्य दिशा आणि संधी मिळते,” असे मत व्यक्त केले. कबड्डी हा केवळ खेळ नसून संघभावना, शिस्त आणि धैर्य यांचे संस्कार घडवणारे माध्यम आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाला मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, खरेदी-विक्री संघाचे संचालक विनोद कुचनकर, तालुका उपाध्यक्ष राकेश शंकावार, सरपंच हेमलताताई बोढाले, कैलास निखाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्थानिक नागरिक व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचे उत्साहवर्धन केले.
आयोजकांनी केलेल्या नियोजनाचीही सर्वत्र प्रशंसा करण्यात आली. मैदानावर रंगलेले सामने आणि प्रत्येक चढ-उतारावर उमटणारा टाळ्यांचा कडकडाट यामुळे संपूर्ण गाव क्रीडामय झाले होते. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.
या स्पर्धेमुळे वडजापूरमध्ये क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळाले असून, पुढील सामन्यांकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे


No comments: