प्रशांत चंदनखेडे वणी :-
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सावरकर चौक, जत्रा रोड, वणी येथे राष्ट्रभावनेने ओतप्रोत असा अभिवादन कार्यक्रम पार पडला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचार मंच वणी यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात सावरकरांच्या क्रांतिकारी विचारांचे आणि त्यांच्या राष्ट्रनिष्ठ भूमिकेचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या मनोगतात वक्त्यांनी सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील धैर्य, सामाजिक समरसतेबाबतचे विचार आणि राष्ट्रीय स्वाभिमानाची भूमिका यावर प्रकाश टाकला.
“स्वातंत्र्य हा केवळ इतिहासाचा अध्याय नसून तो सतत जपण्याची जबाबदारी आहे,” असा ठाम संदेश उपस्थितांना देण्यात आला. आजच्या पिढीने राष्ट्रप्रेम, शिस्त आणि स्वावलंबन यांसारख्या मूल्यांची जोपासना करावी, असेही मत व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास दिनकरराव पावडे, नितीन वासेकर, तुकाराम माथनकर, सुरेश मोरे, संजय दोरखंडे, अनुप पावडे, एकनाथ मांडवकर, विशुभाऊ झाडे, डॉ. अनिरुद्ध वैद्य, अंबर घरोटे, किशोर शिरसागर, संतोष कर्णेवार, डहालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments: