भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचे संघटन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने वणी शहरात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान शिबिर’ उत्साहात पार पडले. वसंत जिनिंग हॉल येथे आयोजित या दोन दिवसीय शिबिरात पक्षाच्या विचारधारेपासून ते शासनाच्या योजनांपर्यंत विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरादरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, विकासकामे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘विकसित व आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेची रूपरेषा यावेळी स्पष्ट करण्यात आली.
कार्यशाळेत भारतीय जनता पक्षाचा इतिहास, वैचारिक अधिष्ठान, संघटन विस्ताराची दिशा, कार्यपद्धती, शासनाची कामगिरी, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, बूथ व्यवस्थापन तसेच ‘मन की बात’ यांसारख्या सात महत्त्वपूर्ण विषयांवर विविध मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. या सत्रांमुळे कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामकाज अधिक परिणामकारकपणे राबविण्याची दिशा मिळाली.
या शिबिरात भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल्ल चौहान, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्षा विद्याताई आत्राम, मंडळ अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र बेलूरकर, अंकुश बोढे, जिल्हा सचिव संतोष डंभारे, ज्येष्ठ नेते महादेवराव खाडे यांच्यासह मंडळ कार्यकारिणी, पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबिरामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी हे शिबिर दिशादर्शक ठरणार असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.



.jpeg)
No comments: