मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. ९ मार्च) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल बंडू आत्राम (वय ४०) रा. मार्डी ता. मारेगाव जि. यवतमाळ असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतकाचा मुलगा श्रेयस प्रफुल आत्राम (वय १४) याने आपले काका प्रदीप बंडू आत्राम (वय ३९) यांना घरी जाऊन “बाबांनी घरात फाशी घेतली आहे,” अशी माहिती दिली. त्यानंतर प्रदीप आत्राम यांनी तातडीने घराकडे धाव घेतली.
त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, प्रफुल आत्राम हे घरातील स्वयंपाक खोलीत टिनाच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर गावातील पोलिस पाटलांना घटनेची माहिती देण्यात आली.
या प्रकरणी प्रदीप आत्राम यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबावरून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ नुसार मर्ग नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके व पो.शि. सागर दिपेवार हे करीत आहेत.

No comments: