महावितरणकडून वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणीत आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला असून याबाबत उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांना निवेदन सादर करण्यात आले.
मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. स्मार्ट मीटर योजना ही जनहिताची नसून सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
स्वतः मुख्यमंत्री स्मार्ट मीटरची सक्ती नसल्याचे सांगत असताना महावितरणकडून ग्राहकांना सक्तीचे संदेश पाठविले जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसेच ग्राहकांच्या परवानगीशिवाय मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास आणि विरोध करणाऱ्या नागरिकांवर कारवाई झाल्यास मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देतेवेळी महेश हातगावकर, धीरज पिदुरकर, गोविंद थेरे, प्रविण कळसकर, प्रतिक बुरडकर, सुजित मेश्राम यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: