घराच्या हिस्स्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये झालेला वाद हिंसक वळणावर पोहोचला. घराचा हिस्सा मागितल्याचा कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार करून जखमी केल्याची घटना वणी शहरातील गोकुळनगर परिसरात घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, रुपेश शंकर आत्राम (वय ३५) हे मिस्त्री काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी (११ जुलै) रात्री ८ वाजताच्या सुमारास ते घरी असतांना त्यांच्या पत्नीने पिण्यासाठी पाणी मागितल्याचा किरकोळ कारणावरून रुपेशच्या आईने घरात वादाला सुरुवात केली. त्यानंतर घराच्या जागेतील हिस्स्याबाबत चर्चा सुरू झाली. यावेळी रुपेश आत्राम याने वडिलोपार्जित जागेत आपला हिस्सा मागून घर बांधण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, याच मुद्द्यावरून त्यांचा लहान भाऊ राजू शंकर आत्राम संतापला. त्याने शिवीगाळ करत हातातील लाकडी दांडक्याने रुपेश यांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात रुपेश यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच त्यांच्या पत्नीलाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे
घटनेनंतर जखमी रुपेश आत्राम यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजू शंकर आत्राम (वय २५) व त्याच्या ६० वर्षीय आईवर बीएनएसच्या कलम ११८(१), ३(५), ३५१(२)(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
घरगुती व मालमत्तेच्या वादातून वाढणाऱ्या हिंसक घटनांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येत असून, अशा वादांचे कायदेशीर आणि सामोपचाराने निराकरण करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

No comments: