महागाईने सर्वसामान्यांच्या घरातील अर्थकारणाचे गणित पुन्हा एकदा बिघडवले असून, खाद्यतेलासह साखरेच्या वाढलेल्या दरांनी नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. काही दिवसांपूर्वी ३५ ते ४० रुपये किलो मिळणारी साखर आता तब्बल ६५ ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ‘साखरेचा गोडवा’ही सर्वसामान्यांसाठी महागडा ठरू लागला आहे.
दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असल्याने घरखर्चाचा ताळमेळ बसवताना गृहिणींची मोठी कसरत होत आहे. उत्पन्नात विशेष वाढ नसताना वस्तूंचे दर मात्र झपाट्याने वाढत असल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडले आहे.
सकाळच्या चहापासून सणासुदीच्या गोडधोडापर्यंत साखरेचा वापर अपरिहार्य आहे. मात्र, साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम आता रोजच्या चहाच्या कपावरही जाणवू लागला आहे. ‘चहाचा कप तसाच; पण खर्च वाढला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सणासुदीच्या काळात साखर, खाद्यतेल आणि इतर किराणा वस्तूंच्या वाढत्या दरामुळे घरगुती खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उत्पन्न तेवढेच, खर्च मात्र वाढता
महागाईचा सर्वाधिक फटका रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना बसत आहे. उत्पन्नाचा आकडा कायम असताना किराणा, खाद्यतेल, साखर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याने महिन्याचा खर्च भागवणे कठीण होत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना गरजेच्या वस्तूंच्या खरेदीतही काटकसर करावी लागत आहे.
साखरेच्या दरवाढीचा परिणाम केवळ घरगुती वापरापुरता मर्यादित राहणार नसून चहा, मिठाई, बेकरी आणि विविध खाद्यपदार्थांच्या किमतींवरही होण्याची शक्यता आहे. परिणामी सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महागाईवर नियंत्रणाची मागणी
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहाव्यात, यासाठी प्रशासनाने बाजारभावावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. महागाईचा आलेख असाच वाढत राहिला तर सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित आणखी बिघडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
एकीकडे सणासुदीची लगबग सुरू असताना दुसरीकडे वाढत्या महागाईने सामान्यांच्या चेहऱ्यावरची चिंता वाढली आहे. त्यामुळे ‘साखरेचा गोडवा तरी परवडू द्या’, अशीच भावना आता सर्वसामान्य ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.

No comments: