चोरटे बंद घराला टार्गेट करू लागले असून शहरात घरफोडीच्या घटना वाढू लागल्या आहेत. कुटुंबीय घराला कुलूप लावून नागपूरला गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना स्वामी समर्थ नगर परिसरात उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पियुष रमेशचंद चोरडिया यांनी याबाबत वणी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या माहितीनुसार, चोरडिया कुटुंबीय २१ ऑगस्ट रोजी दुपारी घराला कुलूप लावून नागपूरला गेले होते. दरम्यान, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांचे वडील घरी परतले असता मुख्य दरवाज्याचे कुलूप स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने तोडलेले व दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.
घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटाचे लॉकर तोडून त्यातील पैंजण, बिछिया आणि पाच चांदीच्या अंगठ्या, असे अंदाजे २५० ग्रॅम वजनाचे व सुमारे १५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. फिर्यादीच्या आजीच्या खोलीतील कपाटही तोडण्यात आले असून, त्यातील नेमका किती ऐवज चोरीला गेला हे आजी परतल्यानंतर स्पष्ट होणार असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पियुष चोरडिया यांचे घर २१ ऑगस्ट दुपारी ते २५ ऑगस्ट सायंकाळपर्यंत बंद होते. याच कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केल्याचा संशय असून, वणी पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत तपास सुरू केला आहे.

No comments: