Latest News

Latest News
Loading...

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी 

काँग्रेस कमिटीचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची वणी पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. परंतु या प्रकरणात त्यांचे हेतुपुरस्सरपणे नाव गोवण्यात आल्याची तक्रार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. इजहार शेख हे शहराबाहेर असतांना देखील त्यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आल्याने त्यांची नाहक बदनामी होऊ लागली आहे. त्यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीला खिंडार पाडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असून त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणण्याचा घाट रचला जात आहे. इजहार शेख यांचा मारहाण प्रकरणाशी काहीही संबंध नसतांना सूडबुद्धीने त्यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं जात आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे पूर्णतः तथ्यहीन असून त्यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

आम आदमी पार्टीचे तालुका संयोजक निखिल ढुरके यांना ९ ऑगष्टला दीपक चौपाटी परिसरातील एका चाय कॅन्टीनवर चार जनांनी स्टील रॉडने अमानुष मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांचे नाव तक्रारीत नोंदविण्यात आले. त्यामुळे मारहाण प्रकरणात पोलिसांनी इजहार शेख यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहे. परंतु मारहाण झाली त्यावेळी इजहार शेख हे शहरातच नसल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ते शहराबाहेर असतांना हे मारहाण प्रकरण घडले. त्यामुळे त्यांचे हेतुपुरस्सरपणे या मारहाण प्रकरणाशी नाव जोडण्यात येत आहे. त्यांचा या मारहाण प्रकरणाशी काही एक संबंध नसतांना सूडबुद्धीने त्यांचं तक्रारीत नाव नोंदविण्यात आलं आहे. त्यांची राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रतिमा डागडाळ करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांचं सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी योगदान राहिलं आहे. सामाजिक कार्यात ते नेहमी तत्पर असतात. दातृत्व भावना जपणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. राजकीय क्षेत्रातही ते नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळे त्यांचं राजकीय वलय नाहीसं करण्याकरिता त्यांना या प्रकरणात गोवलं जात आहे. त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या विरुद्ध ही खोटी तक्रार देण्यात आली असून त्यांच्यावर विनाकारण गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, एसडीपीओ व ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

निवेदनावर माजी आमदार वामनराव कासावार यांच्यासह काँग्रेसचे महेंद्र लोढा, राकेश खुराणा, डॅनी सॅन्ड्रावार, ओम ठाकूर, डेव्हिड पेरकावार, नईम अजीज, राजीव कासावार, अभिजित सोनटक्के, घनश्याम बोबडे, अशोक पांडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

No comments:

Powered by Blogger.