प्रशांत चंदनखेडे वणी
पती अगदीच साधा भोळा, पत्नीवर त्याचा मोठा जीव, विश्वास अगदीच जीवापाड, विश्वासाच्या धाग्यात नात्याची गुंफण झालेली, पठ्ठा शेतकरी रांगडा गडी, पत्नीला सुखात नांदवायचा, पत्नीवर जीव भाळायचा, त्यांचं सुखी सांसारिक जीवन सुरु असतांनाच पत्नीच्या वाईट नजरेने संसाराचा घात केला. पत्नीचं पाऊल डगमगलं आणि संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला. पत्नी एका युवकावर भाळली, आणि त्याच्या मोहात पडून घरून पळून गेली. पोटच्या पोरांचाही विचार केला नाही. आठ ते नऊ वर्षाची मुलगी व अडीज वर्षाच्या मुलाशी मायेची नाळ तोडून ती प्रियकरासोबत निघून गेली. क्षणिक सुखाच्या मोहात अडकून तिनं सांसारिक जीवनाशी नातं तोडलं. विवाहानंतर पती व मुलाबाळांसह संसार सुरु असतांना अचानक तिच्यावर प्रेमाचा रंग चढला. शारीरिक आकर्षणाला प्रेम समजून ती त्या युवकासोबत पळून गेली. प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहचलं. प्रियकराचा हात धरून ती पोलिस स्टेशनला आली. नवरा व मुलं सोडून तिला प्रियकर आपलासा वाटू लागला. नवऱ्यासोबत संसार करणार नसल्याच्या जिद्दीने ती पेटली. नवऱ्यासमोर प्रियकराचा हात धरून ती वावरत होती. नवरा केविलवाण्या नजरेने तिच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यासमोर त्याची पत्नी परपुरुषाच्या हातात हात घालून मिरवत असतांना त्याचं काळीज फाटत होतं, पण अश्रूंना वाट मोकळी करून देण्यापलीकडे तो काहीही करू शकत नव्हता. त्याने तिची समजूत काढण्याचा जीवतोड प्रयत्न केला. पण प्रेमात ती आंधळी झाली होती. मुलं मायेच्या ओढीने तिच्याकडे झेपावत होती, पण तिने मुलांच्या निरागसतेकडेही दुर्लक्ष केलं. तिला प्रेमाचं भूत शिवलं आणि तिने संसाराची पार राखरांगोळी केली.
तालुक्यातील मजरा या गावातील युवकासोबत तिचं लग्न झालं. युवक हा साधा भोळा शेतकरी असून पत्नीला तो सुखात नांदवायचा. त्यांचं सुखी सांसारिक जीवन सुरु होतं. एक मुलगी व एक मुलगा असा त्यांचा सुखाचा संसार. पती शेतकरी रांगडा गडी, तो पत्नीला खूप जीव लावायचा. पण पत्नीचं पाऊल मात्र डगमगलं. ती परपुरषाच्या मोहात अडकली. ते म्हणतात ना, बाहेरख्याली प्रवृत्तीने संसाराचं वाटोळं होतं. शेवटी या दोघांच्या संसारातही तेच झालं. एका युवकावर भाळून ती कायम घर सोडून निघून गेली. सांसारिक जीवनात तिला प्रेमाचं भूत शिवलं, आणि झपाटल्यागत ती त्याच्यामागे पळत सुटली. परपुरुष व परस्रीचा नाद, संसाराचा करतो घात, असे म्हणतात. ती दोन लेकरांची माय देखील परपुरुषाच्या नादात संसाराचं भान हरपली. आणि संसाराचं वाटोळं करून त्या युवकासोबत पळून गेली.
शारीरिक आकर्षणाला प्रेम समजून विवाहित महिला कुणाच्याही भूलथापांना बळी पडू लागल्या आहेत. शारीरिक मोहात पडून आपला संसार उध्वस्त करू लागल्या आहेत. विवाहित महिलांचे घरून पळून जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विवाह झाल्यानंतर त्यांच्यावर प्रेमाचा रंग चढू लागला आहे. लग्न झाल्यानंतर सांसारिक जीवनात रममाण होण्याऐवजी परपुरुषाच्या नादी लागून त्या आपले चरित्र कलंकित करू लागल्या आहेत. महिलांच्या घरून निघून गेल्याच्या कित्येक तक्रारी रोज पोलिस स्टेशनला दाखल होतात. नंतर त्यांचा शोध घेतांना त्यांच्या कुटुंबाची व पर्यायाने पोलिसांची चांगलीच दमछाक होते. एका युवकाच्या प्रेमात पडून घरून निघून गेलेल्या त्या मुलाच्या आईला गावातील सरपंचांनीही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती समजण्यापलीकडे होती. तिच्यावर प्रेमाचं भूत संवार झालं होतं. ती कुणाचं काहीही ऐकायला तयार नव्हती. शेवटी नवरा व मुलांशी नातं तोडून ती प्रियकराचा हात धरून निघून गेली. आणि नवरा मात्र केविलवाण्या नजरेने तिच्याकडे बघत राहिला.

No comments: