प्रशांत चंदनखेडे वणी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दीना निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ६२ युवकांनी रक्तदान करून मानवमुक्तीसाठी आपला देह झिजविणाऱ्या बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. मनीष नगर येथील आंबेडकरी युवकांनी ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ६२ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. नागपूर येथील लाईफ लाईन ब्लड बँकेच्या माध्यमातून या शिबिरात रक्त संकलन करण्यात आलं.
रक्त पेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून रक्तदान शिबिरांचं आयोजन करणं गरजेचं झालं आहे. नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली आहे. गंभीर आजारग्रस्त रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. प्रसुतीपश्चात महिलांनाही मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. अपघातात झालेला अति रक्तस्त्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमध्ये योग्यवेळी रुग्णांना रक्त मिळाले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशा वेळी माणसाने दान केले रक्तच दुसऱ्या माणसाचे प्राण वाचवू शकते. त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्व आहे. तेंव्हा आपल्या रक्तामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो, ही जाणीव ठेऊन रक्तदान करणं गरजेचं आहे. आजारग्रस्त मानवी शरीराला लागणारी रक्ताची गरज ओळखून मनीष नगर येथील आंबेडकरी युवकांनी घटनाकाराच्या महापरिनिर्वाण दीना निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. या रक्तदान शिबिरात ६२ युवकांनी रक्तदान करून महामानवाला आदरांजली वाहिली. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता संस्कार तेलतुंबडे, कुंदन नगराळे, अंकित पाझारे, काजल वाळके, धम्मरूचा दारुंडे, अंकिता पथाडे यांनी विशेष सहकार्य केले.

No comments: