विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या वणी तालुक्याला धूळ प्रदूषणाचे ग्रहण, धूळ प्रदूषणाने जनजीवन झाले प्रभावित


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी विधानसभाक्षेत्रात विकासकामांना गती मिळाली असली तरी प्रदूषण नियंत्रणाच्या दिशेने कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. प्रदूषण रोखण्याकरिता कोणत्याही प्रकारच्या उपायोजना करण्यात न आल्याने येथील जनता आजही प्रदूषित वातावरणातच जीवन जगत आहे. वणी शहर महामार्गाला जोडण्यात आलं. चौपदरी रस्ते तयार झाले. गल्ली बोळातील रस्तेही गुळगुळीत झाले. प्रशस्त न्यायालयीन इमारतीसाठीही निधी मिळाला. क्रीडा संकुल उभारण्याचं काम सुरु आहे. रेल्वे स्टेशन हायटेक होत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर उडाणपूलही साकार होत आहेत. पण तालुक्यावर पसरलेलं धूळ प्रदूषणाचं काळं सावट अद्यापही हटलेलं नाही. विकासाची कास धरलेला वणी तालुका आजही प्रदूषणाच्या विळख्यातच अडकला आहे. शहराच्या विकासाची गती वाढली. पण प्रदूषणात जीवन जगणाऱ्या नागरिकांच्या आयुष्याचा वेग मात्र मंदावला आहे. धूळ प्रदूषणात श्वास घेणाऱ्या नागरिकांचं आयुष्मान घटू लागलं आहे. मुख्य मार्गावर व रहिवाशी वस्तीला लागून असलेल्या कोळसा सायडिंग धूळ ओकू लागल्या आहेत. कोळसा सायडिंगवरून दिवसरात्र उडणाऱ्या कोळशाच्या धुळीने येथील जनजीवन प्रभावित झालं आहे. धूळ प्रदूषणात भर घालणाऱ्या या कोळसा सायडिंगमुळे प्रदूषणाने उचांकी पातळी गाठली आहे. कोळसा सायडिंगवर अहोरात्र होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे वणी-नागपूर महामार्ग नेहमी धुळीने व्यापलेला दिसतो. वणी-वरोरा, वणी-घुग्गुस व वणी-यवतमाळ बायपास मार्गावर नेहमी धुळीचे साम्राज्य पसरलेले दिसते. रस्त्याच्या कडेला कोळशाच्या काळ्या भुकटीचे थर जमा झालेले पाहायला मिळतात. हवेमुळे व वाहनांच्या जाणे येणे करण्याने ही भुकटी धूळ बनून उडते. त्यामुळे शहराच्या विकासाला काळा डाग लावणारं हे प्रदूषण रोखण्याकरिताही प्रयत्न होणे गरजेचे आहे. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा ध्यास बाळगतांनाच शहरवासीयांना प्रदूषण मुक्त वातावरणात जीवन जगता यावं, याकडेही लक्ष देणं जरुरी असल्याच्या प्रतिक्रिया आता शहरवासियांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. 
वणी तालुका हा कोळसाखाणींनी व्यापलेला आहे. कोळसाखाणीतून सतत कोळशाची वाहतूक सुरु असते. रस्ते व लोह मार्गाने हा कोळसा वीज प्रकल्पांना तथा कोळशावर आधारित उद्योगांना पाठविला जातो. मात्र कोळशाची वाहतूक करतांना किंवा सायडिंगवरून मालवाहू रेल्वेत कोळसा भरतांना वेकोलि कडून कोणत्याही प्रकारच्या दिशा निर्देशांचे पालन करण्यात येत नाही. कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जात कोळसा भरण्यात येतो. त्यामुळे वाहतूक करतांना तो रस्त्यावर पडतो. नंतर त्याची भुकटी तयार होते, व ती रस्त्यावर धूळ बनून उडत असते. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर ताडपत्रीही व्यवस्थित झाकण्यात येत नाही. त्यामुळेही कोळसा ट्रकांमधून खाली पडतो. ताडपत्री व्यवस्थित झाकण्यात येत नसल्याने कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांमधूनही कोळशाची धूळ उडतांना दिसते. कोळसा सायडिंगवरही कुठल्याही नियमांचे पालन करण्यात येत नाही. सायडिंग वरील कोळशाच्या ढिगाऱ्यांवर व सायडिंग परिसरात योग्यरीत्या पाण्याची फवारणी करण्यात येत नसल्याने कोळसा सायडिंगवरून सारखी धूळ उडत असते. ही धूळ वाऱ्याच्या वेगाने आसपासच्या परिसरात परसरते. कोळसा सायडिंग वरून उडणाऱ्या या धुळीमुळे परिसरातील नागरिक बेजार झाले आहेत. 
वेकोलिच्या वणी रेल्वे सायडिंगचे इन्चार्ज असलेले श्रवण कुमार यांच्या दुर्लक्षितपणामुळे सायडिंग व्यवस्थापन ढेपाळले आहे. कोळसा सायडिंग वरून उडणाऱ्या धुळीने वैतागलेल्या नागरिकांनी व खास करून महिलांनी काही दिवसांपूर्वी भव्य मोर्चा काढला होता. परंतु श्रवण कुमार यांनी धूळ प्रदूषण नियंत्रित ठेवण्याचे आश्वासन देण्याऐवजी मोर्चातील महिलांशीच हुज्जत घातली. कोळसा सायडिंगवर प्रदूषण मापक यंत्र अद्याप बसविण्यात आलेले नाही. धूळ प्रदूषण रोखण्यासाठी वेकोलिकडून कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाही. धूळ प्रदूषण होणार नाही याची वेकोलि कडून जराही खबरदारी घेतली जात नाही. तसेच कोळसा सायडिंग लोकवस्तीपासून दूर हलविण्याच्या कुठल्याही हालचाली होतांना दिसत नाही. त्यामुळे कोळसा सायडिंग लगत असलेल्या परिसरातील नागरिकांना धूळ प्रदूषणातच जीवन कंठावं लागत आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे मुख्य मार्गावर व राहुटी भागात असलेल्या या कोळसा सायडिंग हटविण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप त्या दिशेने कोणत्या हालचाली सुरु झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे कोळशाची धूळ ओकणाऱ्या या दोन्ही कोळसा सायडिंग रहिवाशी वस्त्यांपासून हटविण्याची मागणी धूळ प्रदूषणाने वैतागलेल्या नागरिकांमधून होत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी