प्रशांत चंदनखेडे वणी
वृक्ष संवर्धन समितीने २०१० मध्ये वणी शहरात जवळपास ६५० वृक्षांची लागवड केली होती. वृक्षाच्या संगोपनासाठी त्यांनी जीवापाड मेहनत घेतली. वृक्षवाढीकरिता त्यांनी मोठे परिश्रम घेतले. झाडे वाढल्यानंतर रस्त्यांनी जाणे येणे करणाऱ्या नागरिकांना झाडाची सावली मिळू लागली. दरम्यान २०२२ मध्ये चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत काँक्रीट रस्त्याचे बांधकाम मंजूर झाले. रस्त्याचे बांधकाम करतांना झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. चिखलगाव ते वरोरा मार्गावर विकासकामे करतांना मोठमोठी झाडे तोडण्यात आली. पण त्याठिकाणी नवीन झाडे मात्र लावण्यात आली नाही. त्यामुळे आता रस्त्याच्या आजूबाजूला झाडेच दिसत नाही. विकासकाच्या नावाखाली वृक्षतोड करण्यात आली. पण विकासकामे झाल्यानंतर वृक्षरोपण मात्र करण्यात आले नाही. त्यामुळे नैसर्गिक वातावरण बिघडले आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता व प्रदूषण रोखण्याकरिता झाडे लावणे गरजेचे असतांना संबंधितांनी याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी अजिंक्य शेंडे यांनी केली आहे. तसेच आता पावसाळा सुरु झाला आहे. तेंव्हा रस्त्याच्या दुतर्फा झाडे लाऊंन पर्यावरण पूरक वातावरण निर्माण करण्याची मागणी देखील युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. १५ दिवसांत मागण्यांची दखल घेण्यात न आल्यास युवासेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदन देतांना युवासेना व शिवसेनेचे (उबाठा) कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments: