Latest News

Latest News
Loading...

राज्य महामार्गावरील अतिक्रमणात येणाऱ्या इमारतींवरही जेसीबी चालवा, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांची मागणी


प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील मुख्य महामार्गासह प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण बांधकाम विभाग व नगर पालिकेने संयुक्त मोहीम राबवून जमीनदोस्त केले. पक्क्या बांधकामांवरही जेसीबी चालविण्यात आला. यात गरिबांचे निवारे पूर्णतः ध्वस्त करण्यात आले. त्यामुळे गोरगरिबांना बेघर व्हावे लागले. मात्र आता शहरातील साईबाबा मंदिरापासून नांदेपेरा चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या राज्य महामार्गावरील काही इमारती रस्त्याच्या बांधकामात अडथळे ठरू लागल्या आहेत. रस्ता बांधकामात अडथळे ठरणाऱ्या या इमारतींवरही जेसीबी चालविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणीच्या उपविभागीय अभियंत्यांना दिलेल्या लेखी अर्जातून केली आहे. 

शहरात सध्या रस्ते बांधकामांना वेग आला आहे. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरणही केले जात आहे. गल्लीबोळात सिमेंट रस्त्यांचं जाळं विणलं जात आहे. प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे पूर्णतः हटविण्यात आली आहे. वणी वरोरा मार्गावरील पक्क्या घरांवरही जेसीबी चालविण्यात आला. गरिबांचे निवारे उखडून टाकण्यात आले. त्यामुळे गोरगरीब बेघर झाले आहेत. त्यांना कुठली पर्यायी व्यवस्था देखील करून देण्यात आलेली नाही. वणी वरोरा राज्य महा मार्गावरील काही घरे जमीनदोस्त करण्यात आली. तर काही घरांना नोटीस बजावण्यात आली आहे. रस्ता बांधकामात अडथळा ठरणारी  गरिबांची घरे जशी उध्वस्त करण्यात आली, तशी कार्यवाही साईबाबा मंदिरापासून सुरु करण्यात आलेल्या रस्ता बांधकामातही करण्यात येईल काय, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी उपस्थित केला आहे. 

साईबाबा मंदिरापासून सुरु करण्यात आलेल्या रस्ता बांधकामात काही इमारती अडथळे ठरत आहेत. रस्त्यापासून काही मीटर जागा सोडूनच इमारतीचे बांधकाम करण्याचा नियम असतांना इमारती बांधतांना मात्र हा नियम पाळण्यात आलेला नाही. अंदाजे २४ मीटर रुंदीचा हा रस्ता असून या रस्त्यावरील इमारतींमुळे रस्ता बांधकामाला अडथळे निर्माण होत आहे. तेंव्हा साईबाबा मंदिरापासून नांदेपेरा चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामात अडथळे ठरणाऱ्या इमारतींवरही जेसीबी चालवून सामान न्याय करावा अशी अपेक्षा बांधकाम विभागाकडून बाळगली जात आहे. साईबाबा मंदिरापासून सुरु करण्यात आलेल्या रस्त्यावरील इमारतींच्या रूपात असलेलं हे अतिक्रमण हटविण्यात न आल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणीचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या लेखी अर्जातून दिला आहे. 

No comments:

Powered by Blogger.