प्रशांत चंदनखेडे वणी
नागपूर जिल्ह्यातील नरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खेडी (गो.गो.) मन्नाथ ग्रामपंचायत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती श्रमदान करून साजरी करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच नंदा बांदरे व उपसरपंच साहिल ढोके यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपसरपंच साहिल ढोके यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना म्हटले की, महात्मा गांधी यांचे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाचे योगदान राहिले आहे. ते स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. स्वराज्य स्वदेश सर्वोदय ही तत्वे अंगीकारून त्यांनी देशाला परिवर्तनाची दिशा दिली. स्वदेशी चळवळ त्यांनी चालविली. देशवासियांना त्यांनी स्वच्छतेचे महत्वही पटवून दिले. देश आजही त्यांच्या विचारावर चालतो आहे. महात्मा गांधी यांनी देशासाठी केलेलं कार्य सदैव अजरामर राहील.महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने गावात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामपंचायत परिसर साफ व स्वच्छ करण्यात आला. बसस्थानक परिसराचीही सफाई करण्यात आली. मुख्य मार्ग व वैशाली बुद्ध विहार परिसराची देखील यावेळी ग्रामपंचायती कडून साफसफाई व स्वच्छता करण्यात आली. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचाऱ्यांनी गावात राबविलेल्या स्वच्छता अभियानातून गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. या उपक्रमात ग्रा.प. सदस्य दिपक बागडे, राजेंद्र काळबांडे, जयश्री बागडे, आशा वर्कर छाया पाटील, शिल्पा निकोसे, अंगणवाडी मदतनीस जयश्री सोमकुंवर, ललिता बागडे, ग्राम रोजगार सेवक विलास बागडे, संगणक परिचालक मनोज बागडे, ग्रा.प. कर्मचारी राजकुमार बागडे, परतेती नरेगा मजूर भरतराम खंडारे, विनोद खंडारे, नागोलाल बागडे, नरेन्द्र बागडे, राजकुमार वरखडे, विकास बागडे आदींनी सहभाग नोंदविला.



No comments: