Latest News

Latest News
Loading...

रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून मनसेचे तीव्र आंदोलन, मनसे नेते राजू उंबरकर यांचं पाहायला मिळालं रौद्र रूप

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील प्रमुख रहदारीचा मार्ग असलेल्या साई मंदिर चौक ते नांदेपेरा चौफुली पर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावरच तळे निर्माण झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील खड्डे तुडुंब भरल्याने खड्ड्यांचा अंदाज घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी अपघाताची भीती निर्माण झालेली असते. या रस्त्याने मोटारसायकल चालवितांना तर तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे बांधकाम हाती घेण्यात आले असले तरी अद्याप बांधकामाला सुरवात झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील पाणी साचलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन केलं. सार्वजनियक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं हे आंदोलन होतं. मनसे कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर तीव्र रोष व्यक्त करीत रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कमळाची फुले वाहिली. तसेच खड्ड्यात बसून तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं.

साई मंदिर चौक ते नांदेपेरा चौफुली हा रस्ता नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. या रस्त्यावर छोट्या मोठ्या वाहनांचीही प्रचंड वर्दळ असते. शहरातील प्रमुख रहदारीचा हा मार्ग आहे. तसेच नांदेपेरा, वांजरी, मजरा यासह या मार्गावरील इतरही गावातील नागरिकांच्या प्रमुख रहदारीचा हा मार्ग आहे. या गावांमधील नागरिकांना कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त रोजच या मार्गाने शहरात जाणं येणं करावं लागतं. मात्र रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने या मार्गाने मार्गक्रमण करणं जिकिरीचं झालं आहे. 

साई मंदिर चौक ते नंदपेरा चौफुली या रस्त्यावर अनेक रुग्णालये आहेत. रुग्णांना वेळोवेळी उपचाराकरिता या रुग्णालयांमध्ये यावे लागते. मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या मार्गावर मंगल कार्यालये, रेस्टोरंट, हॉटेल, मोठमोठी व्यावसायिक प्रतिष्ठाने, मॉल, नामांकित शाळा व कार्यालये असल्याने हा रस्ता नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. प्रमुख रहदारीचा हा रस्ता असतांनाही या रस्त्याचे अजूनही बांधकाम करण्यात आले नाही. या रस्त्याचे बांधकाम हाती घेतल्याचे सांगण्यात येते. किंबहुना अद्यापही या रस्त्याच्या बांधकामाला सुरवात झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढेपाळलेल्या कारभारामुळे या रस्त्याच्या बांधकामात दिरंगाई होत आहे. 

या रस्त्याची अवस्था आता अधिकच बिकट झाली असून या रस्त्याने मार्गक्रमण करणे अत्यंत कठीण झाले आहे. या रस्त्याने मोटारसायकल चालवितांना तर तारेवरची कसरत करावी लागते. सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यावरील विजेचे खांब व झाडे रस्त्याच्या बांधकामात अडथळे ठरत असल्याचे सांगून वेळ मारून नेत आहे. पण त्यावर कुठलाच पर्याय व तोडगा काढतांना दिसत नाही. पांदण रस्त्यापेक्षाही वाईट अवस्था या रस्त्याची झाली आहे. पण तरीही सावर्जनिक बांधकाम विभाग डोळे मिटून बसल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून तीव्र आंदोलन केले. 

मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. या रस्त्याच्या बांधकामाचा अद्यापही मुहूर्त न निघाल्याने या रस्त्याने मार्गक्रमण करतांना नागरिकांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्षितपणा या रस्त्याच्या विकासाला नडला आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात बसून व खड्ड्यांना कमळ वाहून मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची डोळे उघाडणी केली आहे.

मनसे नेते राजू उंबरकर यांचं एका कालखंडानंतर पाहायला मिळालं रौद्र रूप 

मनसे नेते राजू उंबरकर हे शहरातील समस्या व प्रश्नांना घेऊन एकेकाळी अधिकाऱ्यांना घाम पुसायला लावायचे. त्याचं तेच रूप आज पाहायला मिळालं. राजू उंबरकर हे रस्त्याची अवस्था व रस्त्याच्या बांधकामात होत असलेली दिरंगाई पाहून चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आपला मोर्चा वळविला. बांधकाम विभागात अधिकारीच हजर नसल्याने राजू उंबरकर यांनी कार्यालयाच्या पायऱ्यांवरच ठिय्या मांडला. जवळपास एक तास ते कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडून बसले. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप-अभियंता केतन परतानी व अधिकारी हितेश राठी हे कार्यालयात पोहचताच राजू उंबरकर यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. त्या दोघांनाही सोबत घेऊन त्यांनी रस्त्याची झालेली अवस्था दाखविली. आणि त्या दोघांनाही चांगलेच खडेबोल सुनावले. राजू उंबरकर यांचं रौद्र रूप पाहून अधिकारीही थरथरले. त्यांनी लगेच कार्यकारी अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधून परिस्थिती समजावून सांगितली. कार्यकारी अधिकाऱ्यांनी केतन परतानी यांच्या कडून परिस्थिती जाणून घेत दोन दिवसांत रस्त्याच्या बांधकामाला सुरवात करण्याचा शब्द दिला. राजू उंबरकर यांनी धारण केलेला रौद्र अवतार पाहून कार्यकर्तेही अवाक झाले. कधी काळी समस्या व प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेणारे राजू उंबरकर आज सर्वांना पाहायला मिळाले.

मुद्द्तीत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास घेण्यात येईल तीव्र भूमिका 

या रस्त्याचे लवकरात लवकर काम सुरु करून ते विहित मुद्दतीत पूर्ण करावे. अन्यथा मनसे कडून तीव्र भूमिका घेण्यात येईल. रस्त्याचे बांधकाम विहित मुद्दतीत पूर्ण न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकाही अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा गर्भित इशारा मनसे कार्यकर्त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून दिला आहे. 

No comments:

Powered by Blogger.