Latest News

Latest News
Loading...

महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचा अभाव, बाजारपेठेतील विद्युत केबल व डीपीला लागली आग

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील खाती चौक परिसरातील एका विद्युत खांबावरून वीज प्रवाहित करणाऱ्या केबलने अचानक पेट घेतला. त्यानंतर याच परिसरातील ऍक्सिस बँकेच्या बाजूला आसलेल्या विद्युत डीपी खालील बॉक्सला आग लागली. त्यामुळे शहरवासियांमध्ये एकच खळबळ उडाली. १० जूनला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास शहरात पाऊस सुरु असतांना ही घटना घडली. त्यानंतर येथील नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला ही माहिती दिली. 

शहरात रात्री पावसाची रिमझिम सुरु असतांना विद्युत खांबावरून वीज सप्लाय करणारा केबल अचानक जळाला. केबल जोडलेल्या ठिकाणावरून विजेच्या ठिणग्या उडून होणाऱ्या आवाजाने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याच दरम्यान ऍक्सिस बँकेच्या बाजूला असलेल्या विद्युत डीपी खालील बॉक्सलाही आग लागली. बघता बघता विद्युत डीपी खालील बॉक्सने प्रचंड पेट घेतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विद्युत केबल व डीपी खालील बॉक्सला आग लागल्याने नागरिक प्रचंड घाबरले. त्यांनी ही माहिती तात्काळ महावितरण कार्यालयाला दिली. 

खाती चौक परिसरात मोठमोठी व्यासायिक प्रतिष्ठाने आहेत. अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांनी वेढलेला हा परिसर आहे. दवाखाने, बँक व इतर कार्यालयांसह नागरिकांची निवास्थानेही या परिसरात आहेत. त्यामुळे विद्युत केबल व डीपीला लागलेल्या आगीमुळे कुठलाही अनर्थ घडू नये, ही चिंता येथील नागरिकांना लागली होती. मात्र सुदैवाने डीपीला लागलेल्या आगीमुळे कुणाचेही नुकसान झाले नाही. महावितरणच्या ढेपाळलेल्या कारभाराचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विजेच्या लपंडावाने तर नागरिक नेहमीच त्रस्त असतातच. पण आता महावितरणच्या देखभाल व दुरुस्ती अभावी नागरिक काळजीत आले आहेत. पावसाळा सुरु होण्यापूर्वी महावितरकडून देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण होणे गरजेचे असते. मात्र अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने महावितरणच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण झाली आहे. 

शहरातील काही भागात अजूनही अतिशय कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे. या भागात अजूनही थ्री फेज विद्युत तारा जोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सारखा होल्टेज कमी जास्त होत असतो. त्यातच सिंगल फेज विद्युत तारा असलेल्या खांबावरून व्यवसायाकरिता वीज कनेक्शन देण्यात आल्याने येथील नागरिकांना होल्टेजच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. कमी होल्टेजमुळे घरातील विजेची उपकरणे व्यवस्थित चालत नाही. एलईडी बल्बचा दिव्यासारखा प्रकाश पडतो. पंखे हाताने फिरवावे असे फिरतात. अनेक वर्षांपासून काही भाग थ्री फेज विद्युत पुरवठ्यापासून वंचित असतांना महावितरणचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे महावितरणच्या वणी विभागाचे काम पूर्णतः ढेपाळले असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून नेहमी ऐकायला मिळतात.


No comments:

Powered by Blogger.