जयस्वाल दाम्पत्य अनंतात विलीन, पती पत्नी व चिमुकलीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, अंत्यविधीला उसळला जनसागर
प्रशांत चंदनखेडे वणी
हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जयस्वाल पती पत्नी व चिमुकलीवर बुधवार १८ जूनला सकाळी ११ वाजता वणी येथील मोक्षधाम येथे शोकाकुल वातावरणात व साश्रूपूर्ण नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या राहत्या घरून फुलांनी सजलेल्या ट्रॅक्टर मधून जयस्वाल दाम्पत्य व चिमुकलीची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी त्यांना शेवटचा निरोप देण्याकरिता नातलग, आप्तस्वकीय व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. त्यांच्या अंत्ययात्रेला जनसागर उसळला होता. खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसे नेते राजू उंबरकर यांच्यासह राजकीय.व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी झाली होते. एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार गोपाल उंबरकर हे देखील अंत्यविधीला उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. तसेच कोळसा व्यावसाय व ट्रान्सपोर्ट व्यवसायातील व्यावसायिकांनीही जयस्वाल दाम्पत्याच्या अंत्यविधीला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून त्यांना शेवटचा निरोप दिला.
वणी शहरातील प्रसिद्ध कोळसा व्यावसायिक व कोल ट्रान्सपोर्टर राजकुमार उर्फ राजा सुरेश जयस्वाल (४१), त्यांची पत्नी श्रद्धा राजकुमार जयस्वाल (३५) व मुलगी काशी राजकुमार जयस्वाल (२३ महिने) यांचा १५ जूनला सकाळी ५.२० वाजता केदारनाथ जवळ झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. राजकुमार जयस्वाल हे ९ जूनला आपल्या परिवारासह उत्तराखंड येथे चारधाम यात्रेकरिता गेले होते. त्यांच्या सोबत त्याचे साडू प्रविण महाजन व मेहुणी पूजा महाजन हे दाम्पत्य देखील देवदर्शनासाठी गेलं होतं. केदारनाथ वरून गुप्तकाशीला जात असतांना अचानक हेलिकॉप्टर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत जयस्वाल पती पत्नी व चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र महाजन दाम्पत्याला दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये रिझर्वेशन मिळाल्याने ते सुदैवाने बचावले.
केदारनाथ वरून गुप्तकाशी करीता उडाण भरलेले हे हेलिकॉप्टर खराब वातावरणामुळे गौरीकुंड जंगलात कोसळल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. या दुर्घटनेत वणी येथील जयस्वाल परिवारावर काळाने घाला घातला. एक हसतं खेळतं कुटुंबं काळाच्या ओघात गडप झालं. जयस्वाल दाम्पत्य व त्यांच्या चिमुकल्या मुलीवर काळाने झडप घातल्याने शहरात दुःखाची लाट पसरली. कुटुंबं व मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. अतिशय सुस्वभावी व मनमिळाऊ असलेले राजकुमार जयस्वाल व त्यांचं कुटुंबं हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याने समाजमन हळहळलं. संपूर्ण शहर शोकसागरात बुडालं.
जयस्वाल दाम्पत्य व त्यांची मुलगी या तिघांचेही मृतदेह रुद्रप्रयाग (उत्तराखंड) वरून दिल्ली आणि दिल्ली वरून नागपूर व नागपूर वरून सकाळी ८.१५ ते ८.३० वाजताच्या दरम्यान वणी येथे आणण्यात आले. नंतर तिघांचेही मृतदेह त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सकाळी ९ वाजता एकाचवेळी तिघांचीही एका फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर मधून अंत्ययात्रा काढण्यात आली. मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता जयस्वाल दाम्पत्य व त्यांच्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पती पत्नीला मुखाग्नी देण्यात आला. तर चिमुकली काशी भूमातेच्या कुशीत विसावली. जयस्वाल कुटुंबाला शेवटचा निरोप देण्याकरिता गणमान्य नागरिकांसह नातलग, मित्र परिवार, व्यावसायिक, शहरवासी असा मोठा जनसागर उसळला होता.
No comments: