प्रशांत चंदनखेडे वणी
गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय वणी (एसपीएम हायस्कुल) येथे सन १९८७-८८ या शैक्षणिक सत्रात १० व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या वर्ग मित्रांनी तब्बल ३७ वर्षांनंतर एकत्र येत शैक्षणिक जीवनातील त्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वर्गमित्रांनी एका वर्गात शिक्षण घेतांना जपलेले ऋणानुबंध व शालेय जीवनातील त्या कटू गोड आठवणी एकंदरीत झालेल्या संवादातून मनमोकळेपणाने मांडल्या. त्या वयातील तो अल्लडपणा, शिक्षण घेताना एकमेकांसोबतच्या त्या गंमती जंमती, एखाद्याची चीड पाडून त्याला गंमतीनं चिडवणं, खेळणं बागडणं, खोड्या करणं, रुसणं फुगणं या व्ह्रदयाच्या कप्प्यात साठवून ठेवलेल्या शाळेतील त्या आठवणी या वर्गमित्रांनी शाळेतच स्नेह मिलन सोहळा घेऊन एकमेकांशी मनसोक्त वाटल्या.
१० वी नंतर हे सर्व वर्ग मित्र विखुरले. कुणी कोणत्या क्षेत्रात गेला. तर कुणी कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण शालेय जीवन ते विसरू शकले नाही. आज हे सर्व विद्यार्थी वेगववेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतांना किरण तेलतुंबडे या तत्कालीन वर्गमित्राने आपल्या १० (बी) व्या वर्गात शिकणाऱ्या वर्गमित्रांना एकत्र आणून एक स्नेह मिलन सोहळा घेण्याची संकल्पना आखली. आणि सुरु झाला त्याचा वर्गमित्रांचा शोध घेण्याचा प्रवास. त्याने १९८७-८८ या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना ही भन्नाट कल्पना सुचविली. शालेय जीवनातील त्या आठवणींना वाट मोकळी करून देण्याकरिता शाळेत परत एकत्र येण्याचं जणू निमंत्रणच त्याने आपल्या वर्ग मित्रांना दिलं. आणि हे सर्व वर्ग मित्र परत विद्यार्थी बनले. शाळाच काय तर शिक्षण सोडून कित्येक वर्षे लोटली असतांना त्यांनी त्याच शाळेत एकत्र येऊन शालेय जीवनातील ते क्षण अनुभवले. शालेय जीवनातील गंमती जंमती व आठवणींनी रंगला तो भन्नाट स्नेह मिलन सोहळा.
शाळेतील शिक्षकांनीही या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती दर्शवली. संस्थाध्यक्ष विजय मूकेवार यांनी या सोहळ्याचं अध्यक्षस्थान भुषवलं. तर सेवानिवृत्त शिक्षक वाळके, गायकवाड, उपरे, जुमडे यांनी वर्ग मित्रांच्या या स्नेह मिलन सोहळ्यात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने हितगुज केली. राष्ट्रगीताने या स्नेह मिलन सोहळ्याला सुरवात झाली. या स्नेह मिलन सोहळ्यात त्यावेळी सोबत असलेले पण आता सोबतीला नसलेले सेवानिवृत्त शिक्षक अक्कलवार, देरकर, गोहोकार, मोरे या शिक्षकांसह तत्कालीन १० वी तील विद्यार्थी राजू ताठे, प्रकाश अलोणे, रवींद्र वाढई, ज्योती पडोळे, रागिणी मडावी, मेघा आम्लेकर यांचं स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या स्नेह मिलन सोहळ्याच्या निमित्ताने वर्ग मित्रांनी शालेय जीवनातील ते खेळ व विविध स्पर्धा घेतल्या. प्रश्न मंजुषा, संगीत खुर्ची या स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षीस वितरणही करण्यात आले. तसेच यावेळी सर्व वर्ग मित्रांनी आपापलने मनोगत व भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नुसबाई चोपणे विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक भूपेंद्र देरकर यांनी केले. सूत्र संचालन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूरच्या प्रोफेसर डॉ. वर्षा राठोड यांनी तर आभार प्रदर्शन उपजिल्हा रुग्णालय राजुराच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता अरके यांनी केले.
या स्नेह मिलन सोहळ्यात किशोर सोयाम, शिल्पा लोणारे, विलास वैद्य, छगन मोरे, मंजुषा देशपांडे, वर्षा दुधेवार, अपर्णा सरमोक्कदम, ज्योती तामगाडगे, नंदू छुगवाणी, वंदना पोटदुखे, भूपेंद्र देरकर, अर्चना झामड, अनिता अरके, रंजना भट, वर्षा राठोड, रश्मी सवरंगपते, कल्पना धानोरकर, विजय जयपूरकर, रजनी वाळके, किरण तेलतुंबडे आदी वर्ग मित्रांनी सहभाग नोंदविला होता.
No comments: