वाहतूक उपशाखेकडून फेरीवाल्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, इरशाद खान यांचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी वाहतूक उपशाखेकडून गरीब फेरीवाल्यांना अनाहक त्रास देऊन त्यांना व्यावसायिक अडचणी निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. रस्त्यावर हातठेले लावून किंवा रस्त्याच्या कडेला बसून लघु व्यवसाय करणाऱ्यांना तंबी देऊन त्यांचं व्यवसाय उपयोगी साहित्य जप्त केलं जात आहे. रस्त्यावर लघु व्यवसाय करून पोटाची खडगी भरणारे छोटे व्यावसायिक वाहतूक विभागाच्या दंडुपशाहीने प्रचंड काळजीत आले आहेत. लघु व्यावसायिकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देण्यात येत आहे. वणी वाहतूक उपशाखेकडून फेरीवाल्यांचं होत असलेलं विडंबन थांबविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
शहरातील गरीब फेरीवाल्यांना वाहतूक उपशाखेकडून प्रचंड त्रास दिला जात आहे. वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याचे कारण पुढे करून त्यांचं व्यवसाय उपयोगी साहित्य जप्त केलं जात आहे. त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांना अपमानित केलं जात आहे. फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल तर त्यांना दंड व सक्त ताकीद देणे अपेक्षित असतांना वाहतूक उपशाखेकडून त्यांच्यावर अतिरेक केला जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणे व वाहतुकीला अडथळे निर्माण करणे, याचे समर्थन करीत नाही. पण वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावरील लघु व्यावसायिकांना खास करून महिलांना ज्याप्रकारे शिवीगाळ व वागणूक दिली जात आहे, ती अतिशय खेदजनक आहे. रस्त्यावर लघु व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना वाहतूक पोलिसांनी बेजार करून करून सोडलं आहे. त्यांना प्रचंड त्रास देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या लघु व्यवसायावर वाहतूक पोलिस गंडांतर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा मनसे तीव्र विरोध करते.
याउलट बाजारपेठेतील व्यावसायिक प्रतिष्ठांसमोर आडवी तिडवी उभी असलेली वाहने वाहतुकीला प्रचंड अडथळे निर्माण करतात. याकडे वाहतूक पोलिस जराही लक्ष देतांना दिसत नाही. अनेक दुकानदारांनी दुकानाबाहेर साहित्य ठेवले आहेत. काही दुकानदार दुकानाचे नामफलक रस्त्यावरच ठेवतात. दुकानांसमोर दुचाकी व चारचाकी वाहनांचा गराडा असतो. त्यामुळे रस्त्यांनी वाहने चालविणे कठीण होऊन बसते. मोठमोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठांसमोर उभ्या असलेल्या वाहनांमुळे रहदारीला अडथळे निर्माण होऊन रस्त्यावर वाहतुकीचे नेहमी जाम लागतात. याकडे मात्र वाहतूक पोलिस गांभीर्याने लक्ष देत नाही.
आता तर शहरातील दुकानांपुढे सेल लागले आहेत. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांची पूर्णतः कोंडी झाली आहे. रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रीघ लागलेल्या दिसतात. काही दुकानांपुढे तर रस्त्यावरच वाहने उभी केलेली पाहायला मिळतात. याकडे मात्र वाहतूक पोलिस डोळेझाक करतात. आणि गरीब फेरीवाल्यांना मात्र टार्गेट करतात. त्यामुळे आपला प्रपंच चालविण्याकरिता रस्त्यावर लघु उद्योग करणाऱ्या व्यवसायिकांचं वणी वाहतूक उपशाखेकडून होत असलेलं विडंबन थांबविण्याची मागणी मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
No comments: