हेलिकॉप्टर दुर्घटना, जयस्वाल दाम्पत्य व मुलीचा मृतदेह घेऊन नातेवाईक रुद्रप्रयाग (उत्तराखंड) वरून निघाले
प्रशांत चंदनखेडे वणी
उत्तराखंड येथे चारधाम यात्रेकरिता गेलेले जयस्वाल पती पत्नी व त्यांची दोन वर्षाची चिमुकली असे एकाच कुटुंबातील तीन जण केदारनाथ जवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली असून त्यांचे नातेवाईक त्यांचे मृतदेह घेऊन रुद्रप्रयाग (उत्तराखंड) वरून रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. उत्तराखंड वरून दिल्ली व दिल्ली वरून नागपूर आणि नागपूर वरून मंगळवार १७ जूनला सायंकाळ किंवा रात्री उशिरापर्यंत वणी येथे त्यांचे मृतदेह पोहोचतील, असे त्यांच्या आप्तस्वकीयांकडून सांगण्यात येत आहे. १८ जूनला रविनगर येथील राहत्या घरून त्यांची अंतयात्रा निघणार असून शहरातील मोक्षधाम येथे त्यांच्या मृतदेहावर अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.
वणी वरून ९ जूनला उत्तराखंड येथे चारधाम यात्रेकरिता गेलेलं जयस्वाल कुटुंबं केदारनाथ वरून हेलिकॉप्टरने गुप्तकाशी येथे जात असतांना हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलं. जयस्वाल दाम्पत्य प्रवास करीत असलेलं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे गौरीकुंड जंगलात कोसळलं. १५ जूनला सकाळी ५.२० वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील कोळसा व्यापारी राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल व चिमुकली काशी जयस्वाल या एकाच परिवारातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या व्हदयद्रावक घटनेने समाजमन हळहळलं. संपूर्ण शहरात शोककळा पसरली. त्यांच्या कुटुंबं व मित्र परिवारावर दुःखाचा पहाड कोसळला.
जयस्वाल दाम्पत्यासोबत त्यांचे नातेवाईकही देव दर्शनाला गेले होते. राजकुमार जयस्वाल यांचे साडू प्रविण महाजन व मेहुणी पूजा महाजन हे देखील केदारनाथ वरून गुप्तकाशीला जाण्याकरिता हेलिकॉप्टरने निघाले होते. पण त्यांना दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये रिझर्वेशन मिळालं होतं. जयस्वाल दाम्पत्य व त्यांची मुलगी ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करीत होते, ते हेलिकॉप्टर गौरीकुंड जंगलात कोसळले. या भीषण दुर्घटनेत जयस्वाल पती पत्नी व दोन वर्षाच्या चिमुकलीचा करून अंत झाला.
रुद्रप्रयाग (उत्तराखंड) प्रशासनाने मृतदेहाची ओळख पटविण्याकरिता मृतदेहाचे डीएनए टेस्ट केले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ उत्तराखंडला रवाना झालेला राजकुमार यांचा चुलत भाऊ पीयूष जयस्वाल व जयस्वाल कुटुंबासोबत देव दर्शनाला गेलेलं महाजन दाम्पत्य हे तिघांचेही मृतदेह घेऊन रुद्रप्रयाग (उत्तराखंड) वरून निघाल्याची माहिती मिळाली आहे.
नातेवाईक तिघांचेही मृतदेह घेऊन दिल्लीला पोहचल्याचेही सांगण्यात येत आहे. १७ जूनला सायंकाळ किंवा रात्री उशिरापर्यंत जयस्वाल दाम्पत्य व चिमुरडीचा मृतदेह वणी येथे पोहचणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जयस्वाल पती पत्नी व चिमुरडीचा मृतदेह वणी येथे पोहचल्यानंतर १८ जूनला त्यांच्या मृतदेहावर वणी येथील मोक्षधाम येथे नातेवाईक, आप्तस्वकीय व मित्रमंडळींच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार होणार आहे. देव दर्शनाला गेलेल्या जयस्वाल दाम्पत्यावर असा हा दुर्दैवी मृत्यू ओढावल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
No comments: