प्रशांत चंदनखेडे वणी :-
मारेगाव तालुक्यातील लाखापुर येथे कौटुंबिक वादाने अचानक हिंसक वळण घेतल्याची घटना घडली असून, वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय तात्याजी आसेकर (वय ३१) हे २८ एप्रिलच्या रात्री शेतातून घरी परतले असता त्यांच्या घरासमोर आरोपी अर्जुन गोपाल हरोर (वय ४३) हा त्यांच्या बहिणीसोबत वाद घालत होता. त्यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न करताच आरोपीने संतापाच्या भरात शिवीगाळ करत हातातील दगडाने अक्षय आसेकर यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.
या हल्ल्यात अक्षय आसेकर हे जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मार लागून त्यातून रक्तस्राव सुरु झाला. त्यानंतर आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर जखमी अवस्थेतच फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 118(1), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तपासाची सूत्रे पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके यांच्याकडे आहेत.
दरम्यान, किरकोळ वादातून वाढणाऱ्या अशा हिंसक घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

No comments: