प्रशांत चंदनखेडे वणी :-
माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या तैलचित्रांची झालेली दुरवस्था पाहिल्यानंतर काँग्रेस नेते संजय खाडे यांनी तैलचित्रांचे जतन, सौंदर्यीकरण आणि परिसराच्या नूतनीकरणाचा निर्धार व्यक्त केला. यासाठी त्यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान तैलचित्रांची आवश्यक दुरुस्ती, संवर्धन, आकर्षक सौंदर्यीकरण तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्याबाबत संबंधितांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. स्मारक परिसर स्वच्छ, सुस्थितीत आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी राहावा, यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
यावेळी संजय खाडे म्हणाले, "देशाच्या महान नेत्यांच्या स्मृती जपणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत सन्मानाने पोहोचावा, यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. तैलचित्रांचे जतन आणि परिसराचे नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल."
या उपक्रमामुळे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळाला नवसंजीवनी मिळणार असून, परिसर अधिक आकर्षक व सुस्थितीत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.


No comments: