प्रशांत चंदनखेडे वणी :-
पानठेल्याजवळ झालेल्या वादातून एका युवकाला लाकडी काठीने मारून जखमी केल्याची घटना ३ सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास सुकनेगाव परिसरातील बाजीराव बाबा मंदिराजवळ घडली. पानठेला बंद करून दुचाकीने घराकडे निघालेल्या युवकाला रस्त्यात गाठून त्याच्या डोक्यावर लाकडी काठीने वार करण्यात आला. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, गजेंद्र रामकृष्ण दोरखंडे (वय ४३, रा. सुकनेगाव) यांचा मारेगाव (को.) येथील आर्यन बारजवळ पानठेला आहे. ३ सप्टेंबर रोजी रात्री ते पानठेल्यावर असताना रस्त्यावर काही जणांची बाचाबाची सुरू होती. यावेळी संदिप भाउराव आस्वले (वय अंदाजे ४०, रा. सुकनेगाव) हा त्यांच्याजवळ आला आणि शिवीगाळ करून निघून गेला.
यानंतर गजेंद्र दोरखंडे यांनी पानठेला बंद केला आणि मित्रासोबत ते दुचाकीने सुकनेगावकडे निघाले. दरम्यान ते बाजीराव बाबा मंदिराजवळ पोहोचताच संबंधित इसम दुचाकीजवळ आला आणि लाकडी काठीने डोक्यावर वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मारहाणीनंतर जीवे मारण्याची धमकी देऊन तो तेथून पळून गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या हल्ल्यात गजेंद्र यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने त्यांनी मित्रासोबत वणी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी झालेल्या मारहाणीबाबत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संदिप आस्वले यांच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२)(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

No comments: